सुनिल अंभोरे प्रतिनिधी
चिखली तालुक्यातील मेरा बु येथील २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याची शेतात जावून एका लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुंजाळा येथे दिनांक २६ सप्टेंबर रोजी १.३० वाजता उघडकीस आली . 
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुंजाळा येथील रहिवाशी असलेले शंकर गौनाजी केदार यांना दोन मुले असून लहान मुलगा संतोष शंकर केदार यांचे दिड वर्षापूर्वी लग्न झाले असून त्याला ४ महिन्याची मुलगी आहे . यांच्या कडे गुंजाळा गावाला लागून गट नंबर ३५० ,३५५ , ३४९ मध्ये ५ एकर जमीन आहे या जमिनीवर त्यांच्या वडिलांनी चिखली येथील आय एफ डी सी बँक कडून गायी साठी १ लाख २० हजार, ट्रॅक्टर साठी ५० हजार, आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मेरा खुर्द कडून २ लाख रुपये पिक कर्ज घेतले होते . असे एकूण ३ लाख ७० हजार रुपये कर्ज होते . दररोज दुधाची विक्री करत कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवित असे तसेच या ३ लाख ७० हजार बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी यावर्षी शेतात सोयाबीन पिकाची पेरणी केली मात्र यावर्षी मुसळधार पाऊस व ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. आता पिकाचे नुकसान पाहून बँकेचे कर्ज कसे फेडावे अशा चिंतेत तो घरात राहत असे . अशा चिंतेत त्याने घरात कोणालाही काहीही न सांगता गावालगत चारा आणण्यासाठी शेतात गेला आणि त्यांच्या शेताला लागून असलेल्या शांताराम मोरे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली . हा प्रकार शेत मालक यांची पत्नी सौ शोभाबाई मोरे ह्या शेतात चारा आणण्यासाठी गेल्या असता त्यांना हा प्रकार दिसून आला आणि आरडा ओरडा केला तेव्हा गावातील लोक धावत गेले. या घटनेची माहिती लगेच कोतवाल सचिन केदार व राजू केदार यांनी पोलिस स्टेशन, तलाठी जाधव यांना कळविले माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी तलाठी जाधव, बिट जमदार पोफळे यांनी पंचासमक्ष पंचनामा करून मर्ग दाखल केला मात्र घरातील कर्ता तरुण शेतकरी मुलगा आणि त्याच्या ४ महिन्याची मुलीच्या डोक्यावरील वडिलाचे छत्र हरवले असल्याने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत .






